• +91 - 7738 342 065
  • chaitanyajambhulpada@gmail.com

चैतन्य चा तपपूर्ती सोहळा

चैतन्य ज्येष्ठ नागरिक सहनिवास'चा तपपूर्ती सोहळा १ डिसेंबर २०२४ रोजी मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात चैतन्यचे विश्वस्त श्री शैलेश राजाध्यक्ष, निवासी बुचे आजी , सेविका अर्चना, अंजली काळवीट, देणगीदार वीरेंद्र तुळजापूरकर यांनी दीप प्रज्वलन करून केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक 'चैतन्य' मधील निवासी श्री. अनिल बाळ यांनी नेहमीच्याच सफाईने केले

यानंतर चैतन्यच्या सर्व सेविकांनी मिळून ईश स्तवन सादर केलं. या गीतासाठी सेविकांना चैतन्यच निवासी श्रीमती माधुरी जोगळेकर शाह यांचं मार्गदर्शन लाभलं होतं. तसंच मार्गदर्शन व पेटीची साथ श्री अवसरीकर ह्यांनी केली

यानंतर चैतन्य मधील सेवकांच्या वतीने सुभाष सोगम यांनी

तर निवासींच्या वतीने कल्पना देसाई यांनी आपल्या 'चैतन्य' मधील अनुभवांबद्दल मनोगत व्यक्त केलं.

विश्वस्तांतर्फे संस्थापक लीना देवस्थळी ह्यांनी आपल्या मनोगतात चैतन्यच्या मागील बारा वर्षात आलेले काही प्रसंग सांगून ज्यांनी मदत केली त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.

चैतन्य' मध्ये दरवर्षीच निवासी आणि सेवक वर्गासाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. या वर्षी आयोजित केलेल्या स्पर्धांचं पारितोषिक वितरण विश्वस्त श्री अरुण काळे व शिरीष घोगे यांच्या हस्ते झालं. तसंच चैतन्य मध्ये 11 वर्षांहून अधिक आपलेपणाने आणि हसतमुखाने काम करणाऱ्या एक वरिष्ठ सेवक व सहा सेविकांना Long Service Award देऊन गौरवण्यात आले.कार्यक्रमाच्या या भागाचं सूत्र संचालन विश्वस्त मुग्धा आपटे यांनी केलं

या नंतर 'एक होता कार्व्हर' या आणि अशा अनेक चरित्रग्रंथांच्या सुप्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला.ही मुलाखत 'चैतन्य' च्या संस्थापक विश्वस्त लीना देवस्थळी आणि डॉ राजेश पुसाळकर यांनी घेतली.

सुमारे दिड तास चाललेल्या या अनौपचारिक गप्पांचा हा थोडक्यात गोषवारा-

गप्पांची सुरुवात अर्थातच 'एक होता कार्व्हर' पुस्तकाने झाली. वीणाताईंनी हे पुस्तक ठरवून लिहिलं नाही. त्यांच्या मुलांना ती लहान असताना कार्व्हरची गोष्ट त्या सांगत असत. रोज थोडी थोडी सांगत कारण त्यांचा लहान मुलगा गोष्ट ऐकता ऐकता झोपून जात असे आणि दुसऱ्या दिवशी तीच गोष्ट पहिल्यापासून सांगण्याचा आग्रह करत असे. म्हणून त्यांनी या गोष्टीच्या नोंदी केल्या, ज्या त्यांची मोठी मुलगी (तेव्हा ती तिसरी-चौथीत असेल) धाकट्याला वाचून दाखवत असे. नंतर काही कारणाने या हस्तलिखित नोंदी इतर लोकांनीही वाचल्या आणि त्यापैकी एकांनी त्यांना ही गोष्ट जास्त लोकांपर्यंत गेली पाहिजे असं सुचवलं. यातून या पुस्तकाचा जन्म झाला. आजवर 'कार्व्हर' च्या तब्बल ४८ आवृत्त्या निघाल्या आहेत आणि जवळपास ३-४ पिढ्यांनी हे पुस्तक वाचलं असावं. आजही लोक वीणाताईंना हे पुस्तक वाचून ते आवडल्याचं आणि ते प्रेरणादायी असल्याचं कळवतात. विशेष म्हणजे अमेरिकेतील हॉवर्ड ब्लॅक युनिव्हर्सिटी मध्ये या पुस्तकाची ख्याती पसरली. तसंच नासा च्या कार्व्हर सेंटर मध्ये मोठ्या पदावर काम करणाऱ्या एका मराठी तरुणाने वीणाताईंचं कार्व्हर पुस्तक वाचलं होतं आणि ते त्याला तिथली कृष्णवर्णीयांची परिस्थिती समजून घ्यायला उपयोगी पडलं असं त्याने आवर्जून सांगितलं.

यानंतर वीणाताई डॉ पांडुरंग खानखोजे या कृषीतज्ज्ञ वरील त्यांच्या 'नाही चिरा..' या पुस्तकाविषयी बोलल्या. योगायोगाची गोष्ट म्हणजे डॉ खानखोजे १९१३ साली डॉ कार्व्हरना भेटले होते. डॉ खानखोजे यांनी गदर चळवळीत भाग घेतला होता. अमेरिकेत शिक्षण घेऊन त्यांनी १९२० ते १९४७ पर्यंत मेक्सिकोत वेगवेगळ्या कृषी सुधारणा केल्या. भारतात मात्र ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत येऊ शकले नाहीत कारण क्रांतिकारक असल्यामुळे त्यांना ब्रिटिश सरकार अटक करू शकली असती. डॉ खानखोजे यांचं इतकं मोठं कार्य असूनदेखील त्यांच्याबद्दल आपल्याकडे कोणालाही फारशी माहितीच नव्हती. त्यामुळे ही माहिती मिळवून त्यांचे अस्सल चरित्र लिहिणं हे अतिशय जिकिरीचं काम होतं. त्याबद्दल वीणाताईंनी केलेलं वर्णन उद्बोधक होतं. डॉ खानखोजे यांचं चरित्र लिहून त्यांनी एका महान परंतु उपेक्षित व्यक्तीचं कार्य मराठी वाचकांसमोर ठेवलं आहे.

वीणाताईंनी चरित्रं लिहिताना अशा व्यक्तींविषयी लिहिलं ज्यांचं कार्य पथदर्शी आहे. सध्याच्या भाषेत ज्यांना- चेंजमेकर्स म्हणता येईल अशांबद्दल त्यांनी लिहिलं आहे.ज्यांच्या कार्याने समस्त मानवजातीच्या उत्थानासाठी उपयोग झाला अशा लोकोत्तर व्यक्तींचं चरित्र वीणाताईंनी लिहिलं. मग ते 'पाणी ही कोणाची वैयक्तिक संपत्ती नसून त्यावर सर्वांचा सामान हक्क आहे . पाणी ही एक राष्ट्रीय संपत्ती आहे' हा विचार घेऊन पाणी पंचायत ही चळवळ उभारणारे विलासराव साळुंखे असोत की आपलं संपूर्ण आयुष्य वृक्ष संगोपन, संवर्धन आणि संवर्धनासाठी खर्च करणारे पर्यावरणवादी डॉ रिचर्ड बेकर असोत! वीणाताईंच्या चरित्रांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या चरित्र नायक/नायिकांचं कार्य निर्विवाद आणि नि:संशय आहे. आणि याबाबत वीणाताईंनी खातरजमा केली आहे हे निश्चित !

या सर्व चरित्र लेखनातून वीणाताईंनी केवळ त्या त्या व्यक्तीचं कार्यच उभं केलं आहे असं नाही, तर कोणत्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे कार्य झालं हेही लिहिलं आहे त्यामुळे ते कार्य अधिकच झळाळून उठतं. शिवाय त्यांच्या या सर्व पुस्तकांमधून आपल्याला समाजातील वेगवेगळ्या समस्यांचं आकलन होतं. आणि काही समस्या अशा आहेत ज्यांना स्थळ-काळाचं बंधन असेलच असं नाही. उदाहरणार्थ भौतिकशास्त्रात भरीव कामगिरी करणाऱ्या लीझ माईट्नर या ऑस्ट्रियन शास्त्रज्ञाला पंधरा वेळा नोबेल पारितोषिकासाठी नामांकन मिळालं. परंतु केवळ एक स्त्री असल्यामुळे त्यांची अवहेलना झाली. तीच गोष्ट डीएनएचा शोध लावण्यात मोलाचं संशोधन करणाऱ्या रोझलिंड फ्रँकलिन यांचीही! त्यांचं मौलिक संशोधन त्यांच्या नकळत पुरुष सहकाऱ्यांनी वापरून नोबेल पुरस्कार मिळवला देखील. मात्र यांचं श्रेय हिरावलं !

वयाची ऐशी वर्षे पूर्ण केल्यानंतर वीणाताईंनी एक मोठं धाडसच केलं ! चंबळ नदीच्या खोऱ्यात २०२३ साली त्या आणि त्यांचे एक सहकारी प्रसाद कुमठेकर फिरले आणि तिथल्या काही मृत नद्या पुन्हा वाहत्या झाल्या हे त्यांनी तिथे प्रत्यक्ष जाऊन बघितलं. डॉ राजेंद्रसिंह राणा यांच्या तरुण भारत संघ तर्फे राबविण्यात आलेल्या जल बिरादरी उपक्रमाअंतर्गत हे विलक्षण परिवर्तन घडून आलं आहे. या प्रवासादरम्यान त्या कितीतरी लोकंना भेटल्या जे पूर्वी डाकू होते, डकैती , लुटालूट करायचे, खंडणी मागायचे. भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे चरितार्थासाठी दुसरा काही मार्गच नव्हता. पण आता याच लोकांनी बंदुका टाकून हातात नांगर घेतलं आहे. पूर्वी पाण्याअभावी इथल्या लोकांनी पलायन केलं होतं. पण आता नद्या वाहत्या झाल्यावर पुन्हा ते आपल्या गावी परतले आहेत. शेती करू लागले आहेत. वीणाताई अशा लोकांबरोबर राहिल्या, त्यांच्याबरोबर जेवल्या, त्यांच्या कहाण्या समजून घेतल्या. वीणाताईंना नवीन विषयाचं असलेलं कुतूहल आणि तो समजून घेण्याचा आणि त्यासाठी कष्ट घेण्याची याही वयात तयारी बघून सगळेच अक्षरश: भारावून गेले!

वीणाताई त्यांच्या पुस्तक लिहिण्यामागच्या चिकाटी, मेहनत आणि ध्यासाबद्दलही बोलल्या. प्रत्येक पुस्तकाचं हस्तलिखित असतं आणि त्याचं लेखन, पुनर्लेखनही करावं लागतं. अनेक संदर्भ शोधून, तपासून पुस्तकासाठी वापरावे लागतात. लौकिकार्थाने त्या विज्ञानाच्या विद्यार्थिनी नाहीत. पण तरीही अनेक वैज्ञानिक संकल्पना त्या समजून घेऊन त्यांचे सोप्या मराठी भाषेत रूपांतर करून त्या वाचकांसमोर मांडतात. पुस्तक प्रकाशित होण्याआधी त्या त्या विषयातील तज्ज्ञांना हस्तलिखित प्रत देऊन त्यांच्याकडून त्या सूचना/दुरुस्त्या मागवतात.

तसंच आपल्या दिनचर्येविषयीही त्या मोकळेपणाने बोलल्या. त्या म्हणाल्या की त्यांच्या घरातल्या लोकांना सर्व गोष्टी हातात आणून देणं (यालाच त्यांनी Baby sitting हा शब्द वापरला ) त्यांनी खूप लवकर बंद केलं. त्यामुळे घरातल्यांनाही जाणीव झाली की त्यांना लेखन करण्यात व्यत्यय येऊ देता कामा नये.

उपस्थित ज्येष्ठ नागरिक आणि इतरही श्रोत्यांना त्यांनी आपल्या वयाच्या ८१ व्या वर्षीही असलेल्या उत्साहाचं आणि ऊर्जेचं रहस्य सांगितलं. त्या म्हणाल्या की आपण आपले प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. 'अमकीच्या साडीचा पोत असाच आहे, तिने आधीचीच साडी पुन्हा नेसली आहे' या आणि अशा गोष्टी बोलण्यामध्ये आपला वेळ घालवू नये. आपण सर्वसाधारणपणे आपल्या मेंदूचा त्याच्या क्षमतेच्या १३% च वापर करतो. त्यापेक्षा जास्त वापर करून काही सकारात्मक गोष्टी कराव्यात असं त्यांनी सुचवलं. शेवटी त्यांनी हेही सांगितलं की आजही त्या रोज सकाळी अर्धा तास व्यायाम आणि संध्याकाळी अर्धा तास चालण्याचा व्यायाम करतात.

कार्यक्रमानंतर अपेक्षेप्रमाणे वीणाताईंभोवती अनेक श्रोत्यांचा गराडा पडला. कोणी त्यांची जुनी ओळख काढत होतं, कोणी त्यांना आणखी कोणाशीतरी बोलायला लावत होतं, कोणाला त्यांच्याबरोबर फोटो काढायचे होते, कोणाला त्यांच्याबरोबर सेल्फी हवा होता. त्या प्रत्येकाशी न कंटाळता, हसतमुखाने बोलत होत्या. आस्थेने समोरच्या माणसाच्या बोलण्यात रस घेत होत्या. सेल्फी, फोटो कशालाही त्या नाही म्हणत नव्हत्या. त्यांचा हा उत्साह, वागण्यातली सहजता, साधेपणा आणि उबदारपणा विलक्षण लोभस होता.

यानंतर डॉ मृदुला दाढे यांची संकल्पना, संहिता आणि गायन असलेला सुप्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या गाण्यांवर आधारित 'जादू अशी घडे ही' हा बहारदार कार्यक्रम झाला. यात डॉ दाढे यांच्याबरोबर श्री. निलेश निरगुडकर यांनी अप्रतिम सहगायन केलं. कार्यक्रमात 'सुंदर ते ध्यान', 'जेव्हा तुझ्या बटांना', 'काळ देहासी आला', 'खेळ मांडियेला', 'कळीदार कपुरी पान', 'शुक्रतारा मंद वारा' यासारखी अवीट गोडीची १२ गाणी सादर करण्यात आली. या कार्यक्रमात हार्मोनियमची साथ नरेंद्र चिपळूणकर यांनी, तबला साथ ऋषिराज साळवी यांनी तर सिंथेसायझर ची साथ पंकज बनसोडे यांनी केली.

सरतेशेवटी आभार प्रदर्शन विश्वस्त प्रिया देवस्थळी ह्यांनी केलं.

तपपूर्ती सोहळ्याची सांगता सुग्रास आणि रुचकर सहभोजनाने झाली.